Friday, August 14, 2026
Home Chandrapur आमदार विजय वडेट्टीवार यांनी काढला बैलबंडी वरून जन आक्रोश महामोर्चा. 📍भाजपने देश...

आमदार विजय वडेट्टीवार यांनी काढला बैलबंडी वरून जन आक्रोश महामोर्चा. 📍भाजपने देश लुटून उद्योगपतींच्या घशात घातला. – आमदार विजय वडेट्टीवार 

0
13

आमदार विजय वडेट्टीवार यांनी काढला बैलबंडी वरून जन आक्रोश महामोर्चा.

भाजपने देश लुटून उद्योगपतींच्या घशात घातला. – आमदार विजय वडेट्टीवार 

सुकदर्शन वृतांत 
ब्रम्हपुरी : (अमरदीप लोखंडे – सहसंपादक) दि,०६/०८/२६ केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या जनविरोधी,शेतकरीविरोधी, युवकविरोधी,वाढत्या महागाईच्या धोरणांच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे आज ब्रह्मपुरी येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार व युवा नेतृत्व शिवानी ताई वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली विराट जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाप्रसंगी आमदार विजय वडेट्टीवार स्वतः बैलबंडी वरती कार्यकर्त्यासह स्वार होऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडांगण येथून निघालेल्या या मोर्चात हजारो नागरिक, महिला, युवक, शेतकरी, कामगार तसेच काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या जन आक्रोश मोर्चाचे नेतृत्व केले .मोर्चेक-यांनीनी दिलेल्या सरकार विरोधी घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेला.मोर्चाला संबोधित करतांना आमदार विजय वडेट्टीवार यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. 
भाजप सरकारने सत्तेचा वापर जनतेच्या हितासाठी नव्हे, तर मोजक्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी केला आहे. देशाची संपत्ती विकण्याचे, सार्वजनिक उद्योग कमकुवत करण्याचे आणि सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचे काम या सरकारने केले आहे. संपूर्ण देशाला लुटून देश गहाण ठेवण्याचे महापाप भाजप सरकारने केले आहे, असा घणाघात त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे, बेरोजगारीमुळे युवकांचे भविष्य अंधारात गेले आहे, तर शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला असून महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न अधिक गंभीर बनले आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे समाजातील प्रत्येक घटक वैतागून गेला आहे.
निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मोठमोठी आश्वासने देण्यात आली,मात्र सत्तेत आल्यानंतर सुमारे एक कोटी महिलांना योजनेतून वगळण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळालेला नाही, कर्जमाफीची घोषणा फसवी ठरली असून त्याचा शेतकऱ्यांना कोणताही लाभ झालेला नाही, असेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक कामात भ्रष्टाचार वाढला असून ४० टक्के कमिशनशिवाय काम होत नाही, असा आरोप करत त्यांनी गोसेखुर्द प्रकल्पाचाही उल्लेख केला. काँग्रेस सरकारच्या काळात मंत्री असताना गोसेखुर्द प्रकल्पासाठी पाच हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. त्यामुळे या भागातील सिंचनाला चालना मिळाली. मात्र आज प्रकल्पांची कामे संथ गतीने सुरू असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी सुपीक शेती कमी मोबदल्यात संपादित करण्याचा प्रयत्न सुरू असून, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे कटकारस्थान सरकार करत आहे.
राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर टीका करताना त्यांनी हजारो शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचे सांगितले. एकीकडे महिलांना आर्थिक मदतीचे आश्वासन देत असताना दुसरीकडे स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जनतेची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
देशभरातील युवकांनी सरकारविरोधातील संताप जंतर-मंतरवर व्यक्त केला असताना त्यांच्यावर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करत, या जनविरोधी सरकारला आता जनता धडा शिकवेल, असा इशाराही काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला.
युवक काँग्रेस नेत्या शिवानी वडेट्टीवार यांनीही सरकारच्या दडपशाही धोरणांवर टीका करत अन्यायाविरोधात एकजूट होण्याचे आवाहन केले. यावेळी विविध मान्यवरांनीही सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. मोर्चाच्या समारोपानंतर तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. 
वाढती महागाई आटोक्यात आणणे, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना हमीभाव व न्याय देणे, महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करणे तसेच सर्वसामान्यांवरील आर्थिक भार कमी करणे, अशा प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
या जनआक्रोश महामोर्चामुळे ब्रह्मपुरीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सरकारच्या धोरणांविरोधातील जनतेचा रोष मोठ्या प्रमाणात व्यक्त झाला.
यावेळी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे,काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, शहराध्यक्ष हितेंद्र राऊत, प्रभाकर सेलोकर
राजेश कांबळे प्रमोद चिमुरकर, योगेश मिसार, डॉ. नितीन उराडे, थानेश्वर कायरकर, सोनू नाकतोडे, वामनराव मिसार, देवलालजी ठेंगरे, ईश्वर कुथे,आसाराम राऊत, देवानंद राऊत, संजय जराते, धनंजय मेश्राम, यांच्यासह तालुक्यातील व आजूबाजूच्या परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!