Home Breaking News पद्मापूर जंगलात रानभाजी तोडण्यासाठी गेलेल्या 30 वर्षीय तरुणाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू 📍या...
पद्मापूर जंगलात रानभाजी तोडण्यासाठी गेलेल्या 30 वर्षीय तरुणाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू
📍या वर्षातील मानव – वन्यजीव संघर्षातील हा 25 वा बळी ; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
सुकदर्शन वृतांत
ब्रम्हपुरी : चंद्रपूर जिल्ह्यात मानव – वन्यजीव संघर्षाची तीव्रता पुन्हा एकदा समोर आली आहे. दक्षिण वनपरिक्षेत्रांतर्गत भुज उपक्षेत्रातील पद्मापूर नियतक्षेत्रात रानभाजी तोडण्यासाठी गेलेल्या 30 वर्षीय तरुणाचा वाघाच्या च्या हल्ल्यात मृत्यू झाला.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्ह्यातील मानव – वन्यजीव संघर्षातील हा यंदाचा 25 वा बळी ठरला आहे.
बल्लारपूर येथील रहिवासी अनिल दिवटे वय,30 वर्ष हे गुरुवारी (9 जुलै) दुपारी 3:30 वा.च्या सुमारास पद्मापूर चक जंगल परिसरात रानभाजी गोळा करण्यासाठी गेले होते. जंगलात भाजी गोळा करत असताना दबा धरून बसलेल्या एका हिंस्त्र वन्यप्राण्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली.हल्ला अत्यंत भीषण असल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची पाहणी केल्यानंतर मानेवरील गंभीर जखमांवरून हा मृत्यू वन्यप्राण्याच्या हल्ल्यामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.नेमका कोणत्या वन्यप्राण्याने हल्ला केला.याचा तपास वन विभागाकडून सुरू असूनघटनास्थळावरील पावलांचे ठसे आणि इतर पुराव्यांची तपासणी करण्यात येत आहे.
या घटनेमुळे पद्मापूर,भुज आणि लगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.जंगलालगतच्या परिसरात रानभाजी,सरपण किंवा अन्य वनउत्पादने गोळा करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी,असे आवाहन वन विभागाने केले आहे.चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत मानव – वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ झाली.
या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या भागांतील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.मृताच्या कुटुंबीयांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली.
error: Content is protected !!